Tuesday, February 12, 2013

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

गझल सम्राट भीमराव पांचाळेंनी आष्टेगावातल्या गझल संमेलनात प्रकाशित होणार्‍या प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी सुरेश भटांचा एक मिसरा दिला आणि तरही गझल लिहायला सांगितली.

"मज दोन आसवांना हुलकावता न आले"

त्यावरुन ही तरही गझल लिहीली.

आयुष्य राजयोगी, उपभोगता न आले
माझे असून "माझे"संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी, दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयश्री अंबासकर

No comments: