Thursday, September 24, 2020

तू असताना...

मी पाचोळा तू नसताना
मी हिंदोळा तू असताना

पोक्त विचारी तू नसताना
मी वय सोळा तू असताना

दु:खद वास्तव तू नसताना
स्वप्ने डोळा तू असताना

एकाकी मी तू नसताना
गर्दी गोळा तू असताना

डोळस वावर तू नसताना
कानाडोळा तू असताना

सावध चौकस तू नसताना
गाफिल भोळा तू असताना

जयश्री अंबासकर
२४ सप्टेंबर २०२०

Saturday, September 19, 2020

वृत्त मालिनी - सोहळे यामिनीचे

 #गझलेतर वृत्तबद्ध कविता

वृत्त_मालिनी
लललल लल गागा | गालगा गालगागा

झुळ झुळ झुळ होता वाहता गार वारा
सुखद उठत होता गारव्याने शहारा
विहरत ढग होते  धुंद दाही दिशाही
 नटुन थटुन येण्या यामिनी वाट पाही

दिवस सरत जाता जाग येते नभाला
विहग परत जाती आपुल्या कोटराला
हळुच मधुर  जाते साद ती चांदण्याला
अधिर अधिर होते रात्र जागावयाला

टिपुर टिपुर होते रात्र कोजागिरीची
उधळण अति होते अंबरी चांदण्यांची
धवल रुप जपावे अंतरी या शशीचे
फिरुन अनुभवावे सोहळे यामिनीचे

जयश्री अंबासकर
१९ सप्टेंबर २०२०

Sunday, September 13, 2020

निर्मळ जगणे जमेल ना

जगलो कायम ऋणात मी, ऋण हे माझे फिटेल ना
आनंदाने कधी तरी, उपभोगाया मिळेल ना

धावत आलो किती पुढे, कोणी उरले सवे अता
मागे फिरता पुन्हा मला, साथी कोणी दिसेल ना

सोडून गेली कशी मला, शोधू आई कुठे तुला
जगणे दुष्कर तिच्या विना, आई फिरुनि दिसेल ना

दु:खी व्हावे किती मना, दु: बघावे किती पुन्हा
पुनरावृत्ती नको नको, शेवट सुखकर असेल ना

आयुष्या रे गणित तुझे, सोडवणे मज जमेल ना
तुकडे सगळे जुळुनि तुझे, कोडे पुरते सुटेल ना

देवा सुंदर तुझ्या परी, मजला हे जग दिसेल ना
झुळझुळ पाण्या परी मला, निर्मळ जगणे जमेल ना

जयश्री अंबासकर

Friday, September 11, 2020

मध्यान्ही तप्त प्रहरी

एक गंमत... "मध्यान्ही तप्त प्रहरी" ही एकच ओळ कडव्याच्या वेगवेगळ्या ओळीत लिहून केलेली कविता !!

मध्यान्ही तप्त प्रहरी
ओसाड पार सारे
बाहेर नाही कोणी
बंदिस्त आत सारे

सुनसान हे मोहल्ले
मध्यान्ही तप्त प्रहरी
कामास कोणत्याही
येईल कोण दारी

दिसतो कुणी बिचारा
पसरूनिया पथारी
मध्यान्ही तप्त प्रहरी
खाऊनिया शिदोरी

उष्म्यास या अघोरी
कंटाळतात सारी
किती काहिली जीवाची
मध्यान्ही तप्त प्रहरी

घामात चिंब सारे
मध्यान्ही तप्त प्रहरी
तलखी कशी शमावी
मध्यान्ही तप्त प्रहरी

मध्यान्ही तप्त प्रहरी
वाराही खूप शिणतो
मध्यान्ही तप्त प्रहरी
वारा मुकाट असतो

मध्यान्ही तप्त प्रहरी
धग सोसतात सारी
मनमानी सूर्य करतो
मध्यान्ही तप्त प्रहरी

जयश्री अंबासकर
११..२०२०


Wednesday, September 09, 2020

भग्नता

ऐलतटावर भग्न उभा मी, पैलतटी तू तृप्त किती
विरहाने उध्वस्त किती मी, मुक्तीने तू शांत किती

ओलावा जगण्याचा गेला, जगणे झाले शुष्क किती
आठवणींच्या पागोळ्यांतुन, जमवत आणू ओल किती

माहित असते श्वास मला जर, उरले या देहात किती
संपवुनी मी आलो असतो, सोपी होती भेट किती

माझे मीच मला सावरतो, बसुनि उसासत राहु किती
थांबुन एका जागी केवळदु: उगाळू तेच किती

दु:खाने या दग्ध जरी मी, आयुष्याला वेग किती
थांबायाला नाही फुरसत, जगण्याचा आवेग किती

जयश्री अंबासकर
०९.०९.२०२०

 

Monday, September 07, 2020

काय होते अताशा

असं आजकाल वारंवार व्हायला लागलंय
डोळ्यातलं पाणी जरा जास्तच वहायला लागलंय
दु:खाने तर येतंच येतं पण हल्ली आनंदात सुद्धा यायला लागलंय
कधी कधी तर निमित्तही लागत नाही…..
डोळे उगाच वहायला लागतात.
आधीकुणी काही बोललं, आवाज चढवला तर यायचं
पण आता….
बाहेर खूप छान पाऊस कोसळत असला,
तर त्याच्या सरी…. डोळ्यातून सुद्धा ओघळतात.
कधी तरी सूर्यास्त बघतांना व्याकूळ होऊन,
तर कधी चांदण्या रात्री चमचमतं चांदणं पांघरुन….
कधी समुद्राच्या निशब्द लाटा
तर कधी आकाशातल्या रंगांच्या छटा
अगदी काहीही निमित्त पुरतं.
कुणाची तरी खूप आतून आठवण येते….
आणि डोळे पाझरायला लागतात.
संध्याकाळी देवापुढच्या दिव्यासमोर परवचा म्हणताना
आणि तिरंग्यापुढे राष्ट्रगीत म्हणताना तर भरुन येतातच येतात.
मुलांच्या Achievements असोत की त्यांच्या आठवणी असोत
डोळे कायम डबडबलेलेच.
टिव्हीवर कुणी छान गात असलं तरी भरुन येतात
कुणी छान बोलत असलं तरी पाणावतात
कधी काही छानसं वाचलं, ऐकलं, बघितलं की
सगळंच धूसर होऊन जातं…..
काय होतंय माहिती नाही
पण अताशा असं होतंय खरं !!
……
हल्ली मी ना…. त्यांच्याशी एक Deal केलंय
आता मनातले सगळे उचंबळ मी त्यांच्या स्वाधीन करते
मग पुढे काय करायचं
हे त्यांचं तेच ठरवतात.
ओलावतात
पाझरतात….
बरसतात….
आणि मी….
आणि मग मी मात्र दिसते…. कायम हसरी !!!!!!!!!!!
 
जयश्री अंबासकर

Friday, September 04, 2020

असोशी

ळख जराही न होती तुझ्याशी
जवळीक वाटे घडावी तुझ्याशी

लाजून होते तुझे बोल तेव्हा
भेटीत होती नव्हाळी जराशी

स्वीकारले ना कधी बंध कुठले
अनुबंध केवळ तुझे काळजाशी

स्वप्नातला गोडवा मी जरासा
ठेवून घेतो नि जपतो उराशी

भेटीत असते किती ती असोशी
भेटीत असते खुमारी जराशी

रस्ता कितीही निराळा असो तो
घेऊन येतो तुझ्या उंबर्‍याशी

विसरून गेलो उरातील दु:खे
आनंद माझा तुझ्या कुंपणाशी

भेटीत करतो खुशामत फुलांनी
नात्यास करतो मशागत जराशी

होती विरक्ती मला जीवनाची
आसक्त झालो पुन्हा जीवनाशी


जयश्री अंबासकर
५ सप्टेंबर २०२०

Thursday, September 03, 2020

झाला हा परिहास म्हणू

भास म्हणू, आभास म्हणू की आला हा दिन खास म्हणू
काय म्हणू या सुखद क्षणांना, आला हा मधुमास म्हणू ?

काजळरात्री कृष्ण तटावर, यमुनेवरती साद पुन्हा
वेड म्हणावे की हृदयाला कृष्णाचा हा ध्यास म्हणू   

विरह म्हणू की शिक्षा होती अपराधांची त्याच जुन्या
जीवन झाले पूर्ण म्हणू की झाला हा वनवास म्हणू

ओढ किती ही, अंतर मिटले रामाचा मी खास जणू
आस म्हणू की कास म्हणू की, रामाचा मी दास म्हणू

कौतुक झाले, त्रागा त्यांचा, दोषी होतो मीच जणू                
दाद म्हणू की आयुष्याचा झाला हा परिहास म्हणू

जयश्री अंबासकर