Monday, September 07, 2020

काय होते अताशा

असं आजकाल वारंवार व्हायला लागलंय
डोळ्यातलं पाणी जरा जास्तच वहायला लागलंय
दु:खाने तर येतंच येतं पण हल्ली आनंदात सुद्धा यायला लागलंय
कधी कधी तर निमित्तही लागत नाही…..
डोळे उगाच वहायला लागतात.
आधीकुणी काही बोललं, आवाज चढवला तर यायचं
पण आता….
बाहेर खूप छान पाऊस कोसळत असला,
तर त्याच्या सरी…. डोळ्यातून सुद्धा ओघळतात.
कधी तरी सूर्यास्त बघतांना व्याकूळ होऊन,
तर कधी चांदण्या रात्री चमचमतं चांदणं पांघरुन….
कधी समुद्राच्या निशब्द लाटा
तर कधी आकाशातल्या रंगांच्या छटा
अगदी काहीही निमित्त पुरतं.
कुणाची तरी खूप आतून आठवण येते….
आणि डोळे पाझरायला लागतात.
संध्याकाळी देवापुढच्या दिव्यासमोर परवचा म्हणताना
आणि तिरंग्यापुढे राष्ट्रगीत म्हणताना तर भरुन येतातच येतात.
मुलांच्या Achievements असोत की त्यांच्या आठवणी असोत
डोळे कायम डबडबलेलेच.
टिव्हीवर कुणी छान गात असलं तरी भरुन येतात
कुणी छान बोलत असलं तरी पाणावतात
कधी काही छानसं वाचलं, ऐकलं, बघितलं की
सगळंच धूसर होऊन जातं…..
काय होतंय माहिती नाही
पण अताशा असं होतंय खरं !!
……
हल्ली मी ना…. त्यांच्याशी एक Deal केलंय
आता मनातले सगळे उचंबळ मी त्यांच्या स्वाधीन करते
मग पुढे काय करायचं
हे त्यांचं तेच ठरवतात.
ओलावतात
पाझरतात….
बरसतात….
आणि मी….
आणि मग मी मात्र दिसते…. कायम हसरी !!!!!!!!!!!
 
जयश्री अंबासकर

No comments: