Saturday, April 24, 2021

द्वंद्व

मी……
कावरीबावरी
पुन्हा…. !!
किती दिवस चालणार असं !!
किती दिवस गप्प बसायचं
मनातलं वादळ मनातच लपवायचं… !
तो आसूड फिरवत राहतो शब्दांचे.
अन्‌ मी फक्त झेलत राहते घाव त्याचे.
त्याचं संकुचित जग
आणि तो स्वयंघोषित स्वामी.
का म्हणून स्विकारलीये मी….त्याची ही गुलामी !!
का सोसतेय हे क्लेश अतोनात
जुळवत राहते शब्दफक्त मनातल्या मनात.
घायाळ होते मीच
त्याच्या शब्दानं आणि माझ्या मौनानं.
………
आता दिवस, आठवडे त्याच विचारात जाणार
जीव सारखा कासाविस होणार
घुसमट माझीच होणार.
तो…..
तो बिनधास्त……
झालेल्या पडझडीपासून अगदी अलिप्त.
स्वत:च्याच विश्वात मस्त !
कधीतरी आठवण आली की येणार,
अन्‌ पुरेशी विद्ध झालेय ह्याची खात्री करुनच जाणार…. !
आणि मी…..
मी त्या जखमेची मलमपट्टी करत
पुन्हा त्याचीच वाट पाहणार.
तो आला की तितक्याच आवेगानं
त्याच्या गळ्यात पडणार.
त्याचा अहं कुरवाळत
पुन्हा पुन्हा घायाळ होणार.
पुन्हा शब्द जिंकणार
आणि पुन्हा पुन्हा मौन हरणार.
…….
पुन्हा ???
नाही…..!!
बास झालं.
मौनानं आता बोलायलाच हवं.
शब्दांना पराभूत करायलाच हवं.
मौनाची ताकद ओळखायला हवी,
शब्दांवर कुरघोडी करायलाच हवी.
…..
येईल का तो  पुन्हा आज
शब्दांची घेवून तशीच मिजास
रेंगाळतोय दाराशी शब्दांचा वावर
मौनाचा ताबा झालाय अनावर
सलामी झालीये
तुंबळ युद्धाची
आता वाट फक्त
दार ठोठावण्याची.
कधी शब्दांची माघार, कधी मौनाची हार
द्वंद्व मनाचं मनाशी, निरंतर सुरु राहणार.
मनाच्या समराला रोज सामोरं जायचं असतं
कधी कुणाला जिंकवायचं…. तुम्हालाच ठरवायचं असतं. 

जयश्री अंबासकर



 

No comments: