Thursday, July 16, 2020

ऋतू येत होते ऋतू जात होते


तरही गझल - ह्या गझलेतला मिसरा आहे  वैभव जोशी ह्यांचा "ऋतू येत होते ऋतू जात होते"

ऋतू येत होते ऋतू जात होते
परी मी सख्याच्याच ध्यासात होते

अता वाटते शांतता जीवघेणी
गदारोळ कारण नशीबात होते

कसा रंग येईल त्या मैफिलीला
तुझे सूर सारेच मौनात होते

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे बाहुपाशात होते

सखा आज येणार माहीत होते
तसे पूर्ण संकेत हृदयात होते

तिन्हीसांज मंदावली का अशी ही
उसासे तिच्या आज श्वासात होते

इथे स्वैर सारे, न लज्जा न काही
इथे सर्व काही बिछान्यात होते

न होते भिकारी, न लाचार कोणी
तिथे सर्व अपुल्या रुबाबात होते

कुणाला दिले ना जरा दु:ख त्याने
जुने भोग त्याच्याहि स्मरणात होते


जयश्री अंबासकर

Friday, June 26, 2020

यश तुझे तुझ्या दारी


नको जगाकडे बघू
असा लाचार होऊन
हिस्सा तुझा सुद्धा आहे
पहा डोळे भिडवून

तुझे तुला मिळणार
जरा ठेव हे ध्यानात
नको घाई घाई करु
नशिबाला दे उसंत

नको विसंबू कुठेही
तुझे काम कर तूच
आल्यावर योग्य वेळ
भाग्य शोधेल तुलाच

मनासारखे आपल्या
नसते सदा घडत
बसायचे का म्हणून
मुळूमुळू रे रडत ?

जीव ओतून तू तुझे
काम कर अविश्रांत
तुला नकार देण्याची
मग कुणाची बिशाद

नको करु हाजी हाजी
तू कोणा सोम्या गोम्याची
तूच आहेस स्वयंभू
नको गुलामी कुणाची

जरा बघ रे ठेवून
स्वत:वर तू विश्वास
यश तुझे तुझ्या दारी
मिरवेल हमखास

जयश्री अंबासकर
२६..२०२०




Tuesday, June 23, 2020

उजळेल केव्हा

दुबळ्या मनाचा, आक्रोश काळा, थांबेल केव्हा
सूर्यात माझ्या, पेटून वणवा, उजळेल केव्हा

मार्गात होते, काटेच काटे,  जखमाच जखमा
हळुवार फुंकर, कोणी तयावर, घालेल केव्हा

कुठली न आशा, होती निराशा, पदरात माझ्या
भाग्यातले हे, दुष्चक्र माझे,  संपेल केव्हा

आभाळ येते, भरुनी पुन्हा पण, कोसळ न त्याला
माझा सुगंधी, मनमोगरा मग, बहरेल केव्हा

उलटेच फासे, पडतात कायम, खेळात माझे
माझ्या नशीबी, आहे किती हे, उमजेल केव्हा

कसदार असुनी, माझे बियाणे, पिकते न काही
शेतात माझ्या, सुख मोतियाचे, उगवेल केव्हा

जयश्री अंबासकर

Wednesday, June 03, 2020

अंतहीन

अस्वस्थ जाणिवा
दाटलेला काळोख
घुसमटलेला श्वास
संपलेली आस
सरपटणारा दिवस
संथ काळरात्री
अगतिकता
भूक
लाचारी
आक्रोश..
हतबलता
विझत जाणं
ठिणगीतली आग….
निपचित
राखेच्या ढिगाखाली !!
………
……
अचानक वावटळ
ठिणगीला जाग
आगीचा भडका
भडक्याचा वणवा
वणव्यातली होरपळ
चक्र तेच
पुन्हा पुन्हा
कधी ठिणगी
कधी वावटळ
कधी वणवा..
कधी होरपळ
अंतहीन….
अंतहीन….
…… ???
नाही…. नाही
हा अंत नाही
नक्कीच नाही
पेटलेली ठिणगी
आकाशाला भिडणार
दाटलेला काळोख
उजळून टाकणार
आणि मग….
हातात हात
दैवाची साथ
निधडी छाती
संकटावर मात
नवं क्षितिज
नवी कास
जुनेच हात
पण नवा आज
नव्या दिशांचा
शोध मनात
सुखाचं कारंजं
प्रत्येक घरात !!

जयश्री अंबासकर

Monday, April 09, 2018

पालवी


पालवी

पार वाळलेले एक
झाड होते कोपर्यात
नसे सभोवती कोणी
नाही दृष्टीच्या टप्प्यात

कुणी म्हणाले तोडा रे
नाही जीव या झाडात
झाड उगीमुगी होते
थोडी धुगधुगी आत

कोणी एकदा बसला
जरा बुंध्याशी थकून 
देह होता शिणलेला
उन्हातान्हात रापून

आली सांजेला ही कोण
कांदा भाकर घेऊन
घास भरवला त्याला
तिने जरासा लाजून

तृप्त झाला जीव त्याचा
गोड भाकर खाऊन
सारा कौतुक सोहळा
बघे झाड ही वाकून

पुन्हा भेटेन म्हणाली
हरखला तो मनात
होई नवी सळसळ
आता सुकल्या झाडात

एकमेकात दोघेही
जेव्हा एकरूप झाली
सरसरुन तेव्हाच
झाडा पालवी फुटली

जयश्री अंबासकर
१.४.२०१८



Saturday, April 07, 2018

अंतर



माझ्या आजूबाजूला विखुरलेलं तुझं अस्तित्व ….
तू नसतानाची माझी सोबत !!
कधी दारात, उंबरठ्यावर,
तू ऑफिसला जाताना,
हळूच गालांवर…कधी ओठांवर
रेंगाळलेलं …
कधी बाल्कनीतल्या चंद्रासोबत मधाळलेलं
तर कधी सकाळच्या कॉफीसोबत वाफाळलेलं
कधी संधीप्रकाशात… जगजीतसिंगसोबत जागलेलं
कधी कवितेत हरवलेलं
कधी हातात गुंफलेलं,
सवय झालीये रे खूप…
तुझ्या असण्याची ;
तुझ्या सोबतच्या जगण्याची !
तुझं अस्तित्व घेऊनच जगतेय
तुझ्या पलिकडल्या जगात वावरताच येत नाहीये
मग वेचत फिरते आजुबाजूला पसरलेल्या तुझ्या आठवणी
ओच्यात गोळा करते रोज
एक एक आठवण घासून पुसून लख्ख करते
आणि मग ओळीने मांडून ठेवते… शोकेस मधे.
ए एक गंमत सांगू तुला…
इथे ना, शोकेसला दारंच नसतात.
त्यामुळे या आठवणी एका जागी रहातंच नाहीत रे…
सारख्या अलगद तरंगत बाहेर येतात
त्यांना गोळा करताना फार दमायला होतं
आणि नेमका त्याच वेळी …
त्याचवेळी तू फ़ोटोपुढे उभा राहतोस
फक्त एका काचेचं अंतर ….
…….
काय करु….
हे अंतर ओलांडताच येत नाहीये रे… 
हे अंतर ओलांडताच येत नाहीये…….. !!

जयश्री अंबासकर
२१.३.२०१८

Wednesday, April 04, 2018

रात्री


परतून येती अशा मुक्त रात्री
कशाला हवी शिस्त बेशिस्त रात्री

नवा गोड अपराध  होणार आहे
नको आज चंद्रा तुझी गस्त रात्री

कशी नोंद करतेस माझ्या गुन्ह्यांची
सजा हर गुन्ह्याची कशी फक्त रात्री

इथे गर्द काळ्या किती संथ रात्री
तिथे मात्र होत्या तुझ्या व्यस्त रात्री

नव्याने पुन्हा भेट व्हावी तुझ्याशी
नवे जागणे अन् नव्या तृप्त रात्री

जयश्री अंबासकर
३.४.२०१८

Tuesday, April 03, 2018

पसंत आहे


सत्य लख्ख मूर्तिमंत आहे
अन्‌ म्हणून नापसंत आहे

फोल वायदा उगाच केला
प्रश्न केवढा ज्वलंत आहे

नूर आज चांदण्यात नाही
कृष्ण सावळा दिगंत आहे

थांब मी जरा जगून घेतो
जीवना तुला उसंत आहे ?

घे शिकून तू जमेल ते ते
नादब्रम्ह हे अनंत आहे

माय माउली जिवंत नाही
फक्त एवढीच खंत आहे

घाव झेलले असंख्य तरिही
हासरा मनी वसंत आहे

जयश्री अंबासकर
३१.३.२०१८

Sunday, April 01, 2018

चंदन



पोर एकलीच होती
घनदाटशा रानात
रान पाखरांच्या सवे
होती अतीव सुखात

कधी ऊन ऊबदार
कधी वारा घाले मिठी
कधी हळवा पाऊस
फिरे तिच्या पाठीपाठी

रानाबाहेर पडले
जेव्हा चुकून पाऊल
सार्‍या जगाला लागली
तिची सुगंधी चाहुल

आले हुंगत हुंगत
लांडगे शहरातले
सुख आयुष्याचे तिच्या
एका क्षणात संपले

रान कावरेबावरे
दृष्ट लागली कुणाची
चंदनाचे हे प्राक्तन
भिती सदा विळख्याची

जयश्री अंबासकर