Tuesday, February 12, 2013

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

गझल सम्राट भीमराव पांचाळेंनी आष्टेगावातल्या गझल संमेलनात प्रकाशित होणार्‍या प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी सुरेश भटांचा एक मिसरा दिला आणि तरही गझल लिहायला सांगितली.

"मज दोन आसवांना हुलकावता न आले"

त्यावरुन ही तरही गझल लिहीली.

आयुष्य राजयोगी, उपभोगता न आले
माझे असून "माझे"संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी, दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयश्री अंबासकर

Tuesday, December 25, 2012

नव्या पिढीचा नवा सूर्य



नव्या वर्षाच्या नवसूर्याचं तेज
नव्या, विचारी, संस्कारी पिढीच्या हातात
ठरवायचं सगळं तुम्हीच
दुबळे, षंढ बाहु की जोर मनगटात

भ्रष्टाचाराच्या गर्तेत भिरभिरायचं 
की पेटवायच्या उत्कर्षाच्या मशाली
ठरवायचं सगळं तुम्हीच
सार्‍या दुनियेचं भवितव्य आहे तुमच्या हवाली 

जुन्या रुढी, परंपरांचं काळं खिन्न आभाळ
की नव्या विचारांची सुंदर, रंगीत सकाळ
ठरवायचं सगळं तुम्हीच
इतिहासाची दलदल की भविष्याची विजयी माळ

पेटून उठायचं अन्यायाच्या ठिणगीतून
की बसायचं पाठीचा कणा मोडून
ठरवायचं सगळं तुम्हीच
उठा....आता चालणार नाही फार उशीर करुन

जयश्री 

Monday, November 19, 2012

नाविन्याची साद

कालचं रोमँटिक वातावरण, अचानक आलेला पाऊस, मित्रांची फरमाईश आणि झालेली कविता ..... :)

सुटला पहाट वारा
अंतरात सळसळ  
मन सुगंधी सुगंधी
पसरला दरवळ
     
नको स्वप्नातून जाग      
नको जाग इतक्यात    
नीज हलके हलके    
पुन्हा आली पापण्यात

कसा मुजोर हा वारा
रेंगाळला खिडकीशी 
पावा मंजुळ मंजुळ
जणु कृष्णाचा कानाशी

मन सैरभैर झाले
वेडावले, खुळावले
कृष्ण रंगाने रंगाने  
चिंब चिंब भिजवले

रेशमाच्या सोनसरी      
आला सोबती घेऊन   
ओला पाऊस पाऊस
ढगातून उतरून

सतरंगी झाले नभ
धरा पाचूने नटली      
ऊन कोवळे कोवळे  
पसरली गोड लाली  

आज सृष्टी देते हाळी
ऐक नाविन्याची साद  
सुख दारात दारात
दे तयाला प्रतिसाद.

जयश्री 

Wednesday, November 07, 2012

ऊन-सावली नाते अपुले



पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन्‌ कधी रुसते

कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन्‌ बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते

कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन्‌ लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते

लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन्‌ कोसळते

कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन्‌ मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन्‌ रिमझिमते

विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजते
गंध मोगर्‍या मीलन राती
फुलून गात्री दरवळते

नात्याची ही वेल आपुली
बावरते, कधी सावरते
स्पर्शलाजर्‍या हिंदोळ्यावर
झुलते आणिक सुखावते.

जयश्री अंबासकर

Wednesday, October 31, 2012

दु:ख झाले पाखरू




आज माझ्या वेदनेला
पंख हसरे लाभले
दु:ख झाले पाखरू
अन नाचु गाऊ लागले

भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली

दूर झाले मग सुखाच्या
पाश सारे तोडले
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.

भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या

जयश्री

Tuesday, May 01, 2012

जुळले अजून आहे


सरले बरेच काही, उरले अजून आहे
तुटले तरी जरासे, जुळले अजून आहे


वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या
वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे


संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या
स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे


वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे


वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी
सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे


आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे


उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे
वाळूत बांधलेले, टिकले अजून आहे


अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी
दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे


जयश्री

Thursday, April 26, 2012

मोहोळ



















आठवणींचं मोहोळ 
आज फुटलं फिरून
सयी छळती जीवाला
डंख मारून मारून

जुन्या पुराण्या  जखमा
पुन्हा नव्याने सलती 
भळभळा लागे वाहू
जरी खपली वरती

कधी आसूड शब्दांचे
गेले कातडी सोलून
कधी कुणी फसविले
गळा केसाने कापून

घाव वर्मावर झाले
काही काळजाच्या पार
परी दुखावून गेले
सग्या सोयऱ्याचे वार

साऱ्या कटू आठवांचे 
येई मळभ दाटून 
होई चित्त सैरभैर
राही काळोख भरून

ओझे झाले पापण्यांना
काळ्या सावळ्या ढगांचे
कोसळे झडझडून 
मन ऋणी आसवांचे

जयश्री 

Wednesday, January 18, 2012

संभल जा जरा .......



आभाळ दाटलेलं
पावसाने जडावलेलं
रस्ता थांबलेला
जरासा सुस्तावलेला
आळस भिनलेला
गारठा वाढलेला
एकांत कंटाळलेला
घरात दडलेला
कॉफीत दरवळलेला
आठवणींनी वेढलेला
कासावीस झालेला
चाहुलीनं मोहरलेला
सरींनी भिजलेला
काचेवर ओघळलेला
खुदकन हसलेला
स्वप्नात हरवलेला
……
….
ए दिल…….. संभल जा जरा……… फिर मुहोब्बत करने चला है तू :)

Thursday, November 03, 2011

जखम


फिरते आहे घेऊन जखम एक ठसठसती
खपली आहे वरती, पण आतून भळभळती

वरपांगी कमालीचा हसरा चेहरा

आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा

आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे
शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे

सवयीचं झालंय आता, हुकमी हसू
कधी मात्र दगा देतात आपलेच आसू

असेल का सोपं यापेक्षा, अश्वत्थाम्याचं जिणं
जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं


जयश्री अंबासकर

Wednesday, November 02, 2011

आशा

कधी कधी फार व्याकुळ होतं मन..... !! काळज्या मनाला अतिशय अस्वस्थ करतात.  पण कुठल्याही गोष्टीत फक्त आणि फक्त Positive विचार करायचा असं ठरवलं की आपोआप मार्ग सुचतो आणि मन शांत होतं.


कासाविस जीव, आवंढा घशात 
अडकलेला श्वास, धडधड उरात 
विलक्षण बेचैनी, काहूर काळजात 
प्रश्नांचं थैमान, मनाच्या तळात 
उत्तरांची आशा, फक्त स्वप्नात 
स्वप्नातली उत्तरं, कधी उजेडात 
कधी उदास, भकास अंधारात 
चिंतेच्या भेंडोळ्या, अडकलेल्या वर्तुळात 
सुटकेची प्रतिक्षा, इतकंच का हातात ?
नक्कीच नाही..हार एवढ्यात 
बरंच काही आहे अजूनही हातात 
निसटलेले क्षण वेचायचे ओच्यात 
नव्याने रंग भरायचे जगण्यात 
उभारी कसोशीने जागवायची मनात 
कारंजं सुखाचं, हसेल दारात 

जयश्री अंबासकर 



दीपज्योती २०११ च्या दिवाळी अंकात छापून आलेली माझी कविता !