Wednesday, February 24, 2010

गरज गरज जब बादल आये

ही आणखी एक कविता....पिल्लाच्या Homework साठी लिहिलेली.

तपती धरती खिल खिल जाए
गरज गरज जब बादल आए

आस लिये वो एक बूंद की
कडक धूप मे जलती रहती
काले बादल जब घिर आए
धरती मन ही मन मुसकाए

बूंदे आयी, खुशिया लायी
बिजली के शर संग है लायी
हर तपनकी वो आग बुझाए
गरज गरज जब जल बरसाए

जयश्री

Tuesday, February 09, 2010

नको आणखी


फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी

नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

जयश्री

Sunday, January 31, 2010

रुतावे कुठे


न काट्‌यास कळले सलावे कुठे

रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे

विषाला अता या उतारा नको
कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे

बरसता जमावे तळे लोचनी
असे पापण्यांनी झरावे कुठे

उरी वेदना, हास्य गालावरी
अशा सोसण्याचे पुरावे कुठे

तिरस्कार झेलून थकलो अता
अशा गुंतण्याचे निभावे कुठे

तुझे चांदणे गोंदले या नभी
निशेच्या नशेने वहावे कुठे

सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा
असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे

अवेळी कसा लोपला सूर्य हा
रित्या अंबराने लपावे कुठे

जयश्री

Tuesday, January 12, 2010

दुरावा

येते का रे तुला आठवण माझी.... होतोस का रे माझ्यासारखाच तू ही व्याकुळ......!!

देतोस का उजाळा
त्या धुंद आठवांना
होतोस काय हळवा
स्पर्शून आठवांना

त्या एकल्या दुपारी
तो प्रश्न कापरासा
होकार लाजरासा
इन्कार ही जरासा

झाल्या कशा अचानक
सांजा अजून कातर
जगणे अवघडलेले
विरहातले निरंतर

आहे तसा शहाणा
अपुला जरी दुरावा
आतून पेट घेतो
पण हाच रे दुरावा

तैसाच चंद्र अर्धा
दोघांत वाटलेला
त्या पौर्णिमेत अजुनी
तू मुक्त सांडलेला

जयश्री अंबासकर

Thursday, April 23, 2009

मन हळूच गाली हसले


अचानक इतका छान, गोड वारा सुटला ना.....  मनात खट्याळ  हसू उमटलं.... आणि मग...........

हा सुटला अल्लड वारा
मन पाकोळीगत झाले
रोमांचित काया सारी
मन हळूच गाली हसले

हे रंग मनाचे सारे
आकाशी कसे उमटले
जाणून गुपित ते गहिरे
मन हळूच गाली हसले

चाहुल खट्‍याळ कुणाची
मन अधिर अधिर का झाले
पाहून कपोली लाली 
मन हळूच गाली हसले

आतूर मनाला सावर
कानात कोण कुजबुजले
नजरेची बघुनी भिरभिर
मन हळूच गाली हसले

लाजून चिंब भिजलेले
मन हिंदोळ्याचे झाले
आंदोलन घेता बुजरे
मन हळूच गाली हसले

जयश्री


Tuesday, April 21, 2009

छळतो अजूनही का


पाऊस कुणाला कसं वेड लावेल ते शब्दात सांगणं कठीण !! पण ह्या गझलेतून व्यक्त करायचा प्रयत्न केलाय.

पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

जयश्री 

Tuesday, April 07, 2009

यावा अशात साजण


सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा

हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्‍याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

निळाईने पसरावे 
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

नभदीप तारकांचे 
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

जयश्री

Tuesday, March 24, 2009

ओसाड राजमार्ग


सोपं जगायची सवय झाली की ....
कठीण उत्तरं नकोशी होतात

थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन
उत्तरं कशीबशी जुळवता येतात.

उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला
सापडतोच कुठला तरी वशिला

चढ उतार नकोच असतात
आडवळणं मग शोधली जातात

तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत

मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन
खरी वाट सोयिस्करपणे विसरुन

सवयी त्याच अंगवळणी पडतात
आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात.

जयश्री 

Sunday, March 22, 2009

अशक्य केवळ


तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

जयश्री

Monday, March 16, 2009

दुसरा कुणीच नाही.....


पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

जयश्री अंबासकर